मराठा आरक्षण आंदोलनामुळे JNPAमहामार्गावर वाहतूककोंडी; सर्वसामान्यांसह वाहतूकदारांना भुर्दंड

मराठा आरक्षण आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासूनच जेएनपीए बंदराकडे जाणारे व बंदरातून बाहेर येणारे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी जेएनपीए महामार्गाचा वापर केल्याने पोलिसांनी अवजड वाहतूक बंद केली, ज्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे JNPAमहामार्गावर वाहतूककोंडी; सर्वसामान्यांसह वाहतूकदारांना भुर्दंड
Published on

उरण : मराठा आरक्षण आंदोलनामुळे शुक्रवारी सकाळपासूनच जेएनपीए बंदराकडे जाणारे व बंदरातून बाहेर येणारे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी जेएनपीए महामार्गाचा वापर केल्याने पोलिसांनी अवजड वाहतूक बंद केली, ज्यामुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे हजारो कंटेनर वाहने अनेक तास अडकून पडली होती. जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर, धुतुम, चिलें ते गव्हाण फाटा अशा जवळपास १२ ते १५ किलोमीटरच्या रस्त्यावर कंटेनरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या कोंडीत उरण शहराच्या पूर्व भागातून ये-जा करणारे अनेक प्रवासी आणि नोकरदार वर्ग तब्बल चार ते पाच तास अडकून राहिले, ज्यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांना थोडेसे अंतर जाण्यासाठी तासतासभर ताटकळत राहावे लागले.

वाहतूकदारांचे मोठे नुकसान

या वाहतूककोंडीचा सर्वाधिक फटका वाहतूकदार आणि व्यावसायिकांना बसला. कंटेनर वेळेवर बंदरात पोहोचू न शकल्यामुळे जहाजावरील माल भरण्याची अंतिम मुदत (व्हेसल कट-ऑफ) चुकली. परिणामी, कंटेनरची निर्यात थांबली. यामुळे होणारे अतिरिक्त शुल्क (charges) आणि विलंब शुल्क वाहतूकदारांना सोसावे लागत आहेत.

"कंटेनर वेळेवर न पोहोचल्यामुळे लागणारे चार्जेस आम्हाला भरावे लागतात. कोणत्याही कारणास्तव बंदराची वाहतूक बंद न ठेवता ती सुरळीत ठेवावी."

पंढरीनाथ गांजवे, रॉयल ट्रान्सपोर्टचे प्रमुख

आंदोलनामुळे वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले, परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. नवी मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक सध्या बंद असून ती रात्री उघडली जाईल.

जी. एम. मुजावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

पोलिसांचे प्रयत्न

वाहतूक सुरळीत करण्यासाठी उरण, न्हावा शेवा आणि गव्हाण फाटा वाहतूक विभागाचे पोलीस सतत प्रयत्न करत होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर वाहनांच्या तीन-तीन रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी प्रयत्नांनी यातील एक रांग सुरू करण्यास यश मिळवले. या आंदोलनामुळे केवळ वाहतूकदारच नव्हे, तर जेएनपीए बंदराच्या एकूण व्यवसायावरही नकारात्मक परिणाम झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in