
नागपूर : कल्याण येथील सोसायटीत मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत सांगितले.
कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ॲड. परब, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.
शुक्लावर निलंबन कारवाई सुरू
शुक्ला हा ‘एमटीडीसी’चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तमपणे बोलतात, ते मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. देशातील वैविध्य टिकले पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. क्षेत्रीय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास तो सहन केला जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.