रामभाऊ जगताप/कराड
‘राज्यातील शालेय शिक्षणात मराठी हीच भाषा अनिवार्य राहील, इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. मात्र, इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती जोडणारी भाषा असून महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे प्रतिपादनही फडणवीस यांनी केले. सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. मृदुला गर्ग, स्वागताध्यक्ष तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ९९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, तसेच ९८ व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. ताराबाई भवाळकर, आमदार सर्वश्री अतुल भोसले, मनोज घोरपडे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, उद्योजक व संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर, जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
साहित्य क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप होणार नाही!
आपण मुख्यमंत्री असताना मराठी साहित्य क्षेत्रात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, ही आपणा सर्वांना व साहित्यिकांना मी ग्वाही देतो. तसेच साहित्यिकांनी राजकारणात यावे; मात्र साहित्य क्षेत्रात राजकारण आणू नये. समाजाच्या जाणिवा विस्तारण्यासाठी साहित्य निर्मिती असते. त्यामुळे टीका आणि गौरव या दोन्हींतून सुधारण्याचा मार्ग शोधला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.