मराठवाड्यात दमदार सुरुवात; पावसामुळे शेतकरी राजा सुखावला, पेरणीला सुरुवात

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद भागात दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मंगळवारी सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
मराठवाड्यात दमदार सुरुवात; पावसामुळे शेतकरी राजा सुखावला, पेरणीला सुरुवात
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सुजित ताजणे/छत्रपती संभाजीनगर

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, खुलताबाद भागात दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. मंगळवारी सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. आज सकाळी दुसऱ्या दिवशीही पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी राजा सुखावला आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली आहे.

हवामान विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार रात्री ११.३० वाजेपर्यंत २३.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आज दिवसभर शहरात कमाल तापमान ३५.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. हवेत आर्द्रतेचे प्रमाण ७७ टक्के असल्याने दिवसभर प्रचंड दमदार सुरुवात केली. गेल्या तीन आठवड्यांपासून शहर आणि जिल्ह्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा होती. शेतकरी वर्ग चिंतेत होता. अनेक भागांत पेरणी रखडली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली ओल जमिनीत नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते. अशा परिस्थितीत झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामाला बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

शेतशिवारात पेरणीची लगबग

सिल्लोड शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये मंगळवारी सायंकाळी पावसाला सुरवात झाली. त्यामुळे अखेर पुढील काही दिवस शेतशिवारात पेरणीची लगबग पाहायला मिळणार आहे. जून महिना सरत आल्याने पावसाची ओढ सर्वांना लागली होती. खरिपाच्या पेरण्यादेखील खोळंबल्या होत्या. मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्यामुळे यावेळी मृगाची पेरणी अपवाद वगळता झालीच नाही. तालुक्यात लागवड झालेली पूर्व हंगामी मिरची उन्हाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागांमध्ये टँकरच्या पाण्यावर हिरवी मिरची जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत होते. मात्र, आता पेरणीचा लगबग सुरू झाली आहे.

रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

आज दुसऱ्या दिवशीही सकाळीच पावसाने दमदार हजेरी लावली. आज सकाळी शहरातील सिडको, मुकुंदवाडी, जालना रोड, सातारा परिसर, देवळाई, उस्मानपुरा, गारखेडा, क्रांती चौक, निराला बाजार, रेल्वे स्थानक परिसर तसेच मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस झाला. वातावरणात गारवा पसरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी युवक आणि लहान मुले पावसात भिजताना दिसली. दरम्यान, खाद्यपदार्थांच्या दुकानांवरही गर्दी वाढल्याचे दिस लागली.

पाऊस एक तास; लाईट सहा तास गुल

मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावताच विजेचा लपंडाव सुरू झाला. वादळ, वारे सुरू होताच शहरातील बऱ्याच भागात लाईट गुल झाली. पाऊस रात्री सुरू होताच एक तास पडला. आणि बऱ्याच भागात सहातास लाईट गुल झाली. त्यामुळे बऱ्याच भागात नागरिकांना अंधारात राहावे लागले.

logo
marathi.freepressjournal.in