शरद पवारांचे वक्तव्य संभ्रम पसरविण्यासाठी; प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अजित पवारांचा खुलासा

"चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याच्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो"
शरद पवारांचे वक्तव्य संभ्रम पसरविण्यासाठी; प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाबाबत अजित पवारांचा खुलासा

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होतील, हे शरद पवारांचे विधान केवळ संभ्रम पसरविण्यासाठी करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये कधीच विलीन करणार नाहीत. मागील अडीच वर्षात मी उद्धव ठाकरेंचा स्वभाव फार जवळून अनुभवला आहे. पवार साहेब कुठलाही निर्णय हा सामूहिकरीत्या घेतल्याचे सांगतात. चर्चा केल्याचे भासवतात. परंतु, त्यांच्या मनात जे असतं तेच ते करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर केली.

शिरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भाजपसोबत जाण्याची चर्चा झाली होती हे किमान शरद पवार आता मान्य करायला लागलेत. दिल्लीत वरिष्ठांसोबत ५ ते ६ बैठका झाल्या. या बैठकीत भाजपसोबत जाण्याचे ठरले होते. पुन्हा मुंबईला आल्यावर निर्णय बदलला. परत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात आता त्यांचा पक्ष आणि चिन्हं वेगळे आहे. कुठे जायचं हा त्यांच्या अखत्यारितील विषय आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याच्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असे अजित पवार म्हणाले.

शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत काँग्रेसवर अदानी-अंबानींकडून ट्रक भरून पैसे घेतल्याचा आरोपावर पवार म्हणाले, मी दिवसभर प्रचारसभांमध्ये व्यस्त होतो. इतक्या मोठ्या पातळीवरील प्रश्न मला विचारू नका. महाराष्ट्रात काय चाललंय याबद्दल मी बोलेल, असे सांगून अजितदादांनी भाष्य करण्याचे टाळले.

रोहितचा तोल बिघडला आहे

रोहित पवारांच्या पैसे वाटपाच्या आरोपावर अजितदादा म्हणाले, रोहितचा अलीकडे तोल बिघडला आहे. संबंधित बँक सुरू असेल तर सीसीटीव्हीतून सत्य बाहेर येईल. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबतीत केलेले विधान चुकीचे होते. त्यांनी असे बोलायला नको होते. अर्थात बारामतीत पवार साहेब उमेदवारच नव्हते. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचा विषयच येत नाही. सुनेत्रा पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यातील एक विजयी तर एक पराभूत होईल, असेही पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in