
नाशिक : अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांविरोधात राज्यभरात अधिकाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन केले. या अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण राज्यातील अन्न विभागातील प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. निलंबन मागे न घेतल्यास हा लढा तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापारी महेश व रमेश तंवर यांच्या दुकानात अप्रमाणित तेलाचे साठे आढळल्यानंतर नाशिक विभागाचे सहआयुक्त महेश चौधरी व नंदुरबार जिल्ह्याचे सहा. आयुक्त संदीप देवरे आणि आनंद पवार यांचे निलंबन करावे, असे आदेश मंत्री झिरवाळ यांनी विधिमंडळात दिले होते. याप्रकरणी आमदार आमशा पाडवी यांनी प्रश्न विचारला होता. त्यानुसार ही कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सबळ कारण नसताना मंत्री झिरवळ यांनी केलेली कारवाई अपमानास्पद असल्याची सर्वत्र भावना आहे.