
मुंबई गोवा महामार्ग आणि त्यावर पडलेले खड्डे, रस्त्याची दुरवस्था सोबत कशेडी घाटात मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. सध्या पाऊस पडत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे चित्र समोर येते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठे विधान केले आहे.
कशेडी घाटात मोठमोठे खड्डे पडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना चार ते पाच तासांचा अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. यावर आज विधानसभेत चर्चा झाली. मुंबई गोवा महामार्गावर अडीच वर्षांत एकही काम झाले नाही का, असा सवाल भाजपने शिवसेना आमदारांना केला. यावर प्रतिउत्तर देताना चंद्रकांत पाटील, नितीन गडकरी यांचे गेल्या 12 वर्षातील अपयश समजायचे का ? असे भास्कर जाधव म्हणाले. रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्ग 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून आरआयबीने रस्त्यावरील खड्डे बुजवायला हवे होते, असेही म्हटले आहे. आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे काम 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.