
मुंबई : दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी ५० लाख रुपये दिले आणि संमेलनाचे आयोजक उषा तांबे यांना मर्सिडीज कार दिल्याचे वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी केल्याचे समजते. निलम गोऱ्हे यांचे हे वक्तव्य खरे की खोटे माहीत नाही, परंतु यामुळे महामंडळाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून महामंडळ विकले गेले का, अशी चर्चा लोकांत असल्याचे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आयोजक उषा तांबे यांना लिहिले आहे. राऊत यांच्या पत्रानंतर उषा तांबे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनाच्या “असे घडलो आम्ही” या कार्यक्रमात गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप केला आहे.
काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का?” असा सवाल राऊतांनी केला आहे.