गुवाहाटीमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पवार यांच्यावर सडकून टीका केली. शहाजीबापू म्हणाले, “वसंतदादा पाटील हे माझ्या वडिलांसारखे आहेत. मी त्यांना कधीही दगा देणार नाही, असे शरद पवार यांनी भाषणात सांगितले होते. त्यानंतर दीड वाजता पवारांनी काँग्रेसचे ४० आमदार फोडले आणि वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ज्या माणसाला पवार यांनी जवळ घेतले, त्यांना संपवले. त्यानंतरही वसंतराव पाटील यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांना पवारांसोबत राहण्यास सांगितले होते. मात्र, जे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहिले ते कुठेच नाहीत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे हे राजीव गांधी यांच्याकडे पळून गेले, त्यामुळे ते वाचले. शिंदेसाहेब काहीही करायला सांगा; पण पवारांच्या जवळ नेऊ नका, नाहीतर आपण संपलो.”
“उजनी धरणातून सांगोला तालुक्याला दोन टीएमसी पाणी १९९७-९८ मध्ये मंजूर झाले आहे. मात्र, आजपर्यंत ते मिळाले नाही. त्या योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात पत्र दिले. पण, त्या पत्रावर अजून निर्णय झाला नाही. वसंतराव नाईक, वसंतरावदादा पाटील, शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या राज्याची प्रगती झाली आहे,” असेही पाटील यांनी सांगितले.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर बोलताना पाटील म्हणाले, “शिंदेसाहेबांनी फोन बंद ठेवायला सांगितले होते. मात्र, गुवाहाटीला आल्यानंतर काही आमदारांना फोनवर बोलताना पाहिले. त्यानंतर म्हटले आपणही फोनवर बोलावे. त्यातच रफिक यांचा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही कुठे आहात. त्यामध्ये मी बोलून गेलो काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, ओक्के आहे सगळं.”