मनसेचाही ‘ईव्हीएम’वर संशय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिळवित ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली व ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या.
मनसेचाही ‘ईव्हीएम’वर संशय
Published on

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यात मनसेच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिळवित ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला. राज ठाकरे यांनी सर्वांची मते ऐकून घेतली व ईव्हीएमबाबत पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना दिल्या. दरम्यान, या सर्व घडामोडींवर राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडणार आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत राज्यातील मनसेचे पराभूत झालेले ८२ उमेदवार तसेच त्या-त्या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी निवडणुकीतील दारुण पराभवासंदर्भात उमेदवारांकडे विचारणा करण्यात आली असता उमेदवारांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त केला. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या गावात आपल्याला एकही मत न मिळाल्याचे म्हटले आहे. पोस्टल मतमोजणीवेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज दिसत होता. मात्र, ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी झाल्यानंतर सगळे निकाल वेगळे लागायला लागले. अशा अनेक शंका मनसेच्या उमेदवारांनी या बैठकीत व्यक्त केल्या.

राज ठाकरेंचा पूर्वीपासून ‘ईव्हीएम’ला विरोध

घरातील लोकांचे मतदेखील मिळाले नसल्याचा दावा काही उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर केला. दरम्यान, २०१४ पासून राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात बोलायला सुरुवात केली होती. मात्र, त्यावेळी कोणताही पक्ष सोबत आला नाही. यंदाच्या निवडणुकीत सगळ्यांना फटका बसल्याने सगळे एकत्र आले आहेत. ईव्हीएमविरोधात जसे पुरावे मिळतील, त्यानुसार पुढील पावले उचलली जातील, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in