

पुणे : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल अतिशय वेगाने सुरू असून, बुधवारी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची अधिकृत घोषणा हवामान शास्त्र विभागाने केली आहे. मंगळवारपर्यंत मान्सूनने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मजल मारली होती; मात्र बुधवारी उर्वरित भागही व्यापल्याने आता संपूर्ण राज्य मान्सूनच्या कवेत म्हणजेच छत्राखाली आले आहे. या सक्रियतेमुळे हवामान विभागाने राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
मराठवाड्यातही मान्सूनची दमदार हजेरी
मराठवाड्यातही मान्सूनने दमदार हजेरी लावली असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडजिल्ह्यांत मुसळधार पावसासह मेघगर्जनेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड, लातूर आणिधाराशिव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भातीलअमरावती, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाअसून, अकोला, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशात अन्यत्र मान्सूनची प्रगती समाधानकारक
देशाच्या इतर भागांतही मान्सूनची प्रगती समाधानकारक असून सध्या मान्सूनची सीमा सुरत, इंदूर, मांडला, दाल्तनगंज आणि मोतीहारी या भागांतून जात आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून गुजरात आणिमध्य प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती करण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा अंदाज
कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, नाशिक व पुणे घाटमाथ्यावर जोरदार ते अतिमुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून सातारा वकोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील.