मान्सूनचे आगमन लांबले; १० जूननंतर येणार पाऊस; पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

आगामी हवामान बदल आणि मान्सून विलंबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी एक जूनपासून सुरू होणाऱ्या केवळ मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
मान्सूनचे आगमन लांबले; १० जूननंतर येणार पाऊस; पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
मान्सूनचे आगमन लांबले; १० जूननंतर येणार पाऊस; पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
Published on

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणावर बदल होण्यास सुरुवात झाली आहे. मे महिन्यातील कडक उन्हाच्या झळांनंतर आता सोमवार, १ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन आठवड्यात हवामानाचा नूर अधिकच बदलणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची दाट शक्यता आहे. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व वादळी पाऊस आहे. मान्सून अद्याप केरळमध्येच रेंगाळत असल्याने महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणार आहे.

आगामी हवामान बदल आणि मान्सून विलंबाने येण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. शेतकऱ्यांनी एक जूनपासून सुरू होणाऱ्या केवळ मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. मान्सूनचे अधिकृत आगमन होऊन पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याची भीती असते.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १ जूनपासून प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल. या भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकण किनारपट्टीच्या भागातही काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.

विदर्भात मात्र उष्णता

मे महिन्याच्या अत्यंत कडक आणि अस्वस्थ करणाऱ्या उन्हाच्या तुलनेत आता येत्या आठवड्यात राज्यातील कमाल तापमानात काहीशी घट होणार आहे, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळेल. मात्र, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भात कमाल तापमान अद्यापही ४० अंश सेल्सिअसच्या वरच कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळात होणाऱ्या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही थेट संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल झालेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in