मान्सूनचा प्रवास खोळंबला; पुढील पाच दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस शक्य

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचा प्रवास एकाच भागात खोळंबला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मान्सूनचा प्रवास खोळंबला; पुढील पाच दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस शक्य
मान्सूनचा प्रवास खोळंबला; पुढील पाच दिवसांत राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस शक्यप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनचा प्रवास एकाच भागात खोळंबला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनने सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांची सीमा ओलांडून रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला होता, परंतु त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनची प्रगती थांबली आहे.

सध्या मान्सूनची सीमा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे आणि सोलापूर, तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील काही ठराविक भागांपर्यंत मर्यादित राहिली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील बुलढाणा जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यातील बीड, धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र केवळ ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत.

पावसाचा जोर विदर्भात असण्याची शक्यता

पावसाचा सर्वाधिक जोर विदर्भात राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. शुक्रवारी बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये, तर शनिवारी अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी देखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा प्रवास थांबलेला असला तरी या वादळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाची हजेरी लागायला सुरुवात होणार आहे.

वादळी वाऱ्यांचा अंदाज

अनेक जिल्ह्यांमध्ये गुरूवारी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामध्ये विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांच्या आणखी काही भागांत पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in