

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा जोरदार सक्रिय होणार आहे. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या उपनगरात शुक्रवारी किंचित हलका पाऊस पडला. मध्य मुंबईत दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. पहाटे आणि दुपारी पावसाच्या किंचित सरी कोसळत असल्या, तरी हवामान बदलामुळे मुंबईकरांना घाम येण्याचे प्रमाण मात्र कमी झाले नव्हते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पुढील ४८ तासांत कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गेले आठ ते दहा दिवस दडी मारलेल्या पावसाने काही भागात पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्यानंतर रायगडमध्ये भातशेती लावण्याच्या कामांना वेग आला आहे.
कोणत्या भागात असेल जोर
कोकण : मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगलीच्या घाट परिसरात जोरदार पाऊस.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, अहमदनगर, जळगाव येथे मध्यम ते जोरदार पाऊस.
मराठवाडा : अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी.
विदर्भ : पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.
जोर वाढणार
अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याला अनुकूल चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत आहेत.