गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे फुल्ल!

१६ मे पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु करण्यात आले असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ मे रोजी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे फुल्ल!
Published on

यंदा १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी या सणांसाठी ४ महिने आधीच तिकीट आरक्षित करत आहेत. १६ मे पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु करण्यात आले असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ मे रोजी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही गाड्यांच्या ठराविक श्रेणीतील बोटावर मोजण्याइतपत आसने शिल्लक आहेत.

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे जातात. रेल्वे, एसटी आणि खासगी गाड्यांनी चाकरमानी कोकण गाठतात. यामध्ये अल्प तिकीट दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते. प्रतिवर्षी दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. यंदा देखील १२० दिवस आधी म्हणजेच ४ महिने आधीपासूनच रेल्वेच आरक्षणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मंगळवार १६ मे रोजी १३ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल तर बुधवार १७ मे रोजी १४ सप्टेंबर रोजीच्या गाडीचे आरक्षण करता येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र अवघ्या २४ तासांच्या आतच मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमधील जवळपास सर्व श्रेणीतील आसने फुल झाली आहेत. यामुळे चाकरमान्यांचे रेल्वेच्या विशेष गाड्यांकडे लक्ष लागले आहे. परिणामी मध्य रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडाव्या लागणार आहेत हे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

गाड्या स्लीपर श्रेणी ३ टायर एसी

कोकणकन्या एक्सप्रेस २८९ १७२

तुतारी एक्सप्रेस ८३ २८

मंगुळुरु एक्सप्रेस ६९ २२

(टीप : वरील गाड्या आणि आसन स्थिती १७ मे रोजी सायंकाळ ६ पर्यंतची आहे)

logo
marathi.freepressjournal.in