छत्रपती शाहू महाराजांच्या २७३व्या स्मृतिदिनानिमित्त साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमात भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले की, "शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो विचार राहिला आहे का? अनेकदा जाती जातीत तेढ निर्माण केली जाते. त्यामुळे सर्वधर्म समभाव हा विचार मागे पडताना दिसत आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांशी बोलायचे कमी होत आहेत. आपण म्हणतो, की आपण २१व्या शतकात जगतो. आपली वाटचाल प्रगतीकडे आहे, ही खरंच प्रगती आहे का? जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल." असे परखड मत त्यांनी मांडले.
घराणेशाहीवरही उदयनराजे भोसले यांनी प्रहार केला. ते म्हणाले, "आज लोकशाहीच्या नावाखाली देशात घराणेशाही चालली आहे. त्याच त्याच घरातील लोक सत्तेत येत आहेत. याच लोकांना ज्ञान आहे आणि इतरांना नाही, असे चित्र उभे केले जाते आहे. यामुळे विकेंद्रीकरणाची संकल्पना मागे पडत चालली आहे. आजकाल फक्त भाषणात विकेंद्रीकरण दिसते. बाकी सगळीकडे केंद्रीकरण सुरु आहे. हे असेच जर चालत राहिले, तर देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आपल्याला आजची ही परिस्थिती पाहायला मिळते"