एमपीएससी परीक्षांच्या तारखा बदला,अतुल लोंढे यांची मागणी

१८ व २५ ऑगस्ट रोजी आयबीपीएसने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
एमपीएससी परीक्षांच्या तारखा बदला,अतुल लोंढे 
यांची मागणी
Published on

मुंबई : १८ व २५ ऑगस्ट रोजी आयबीपीएसने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एमपीएससीने परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला.

टिळक भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोंढे म्हणाले की, राज्य आयोग परीक्षांच्या तारखा ठरवताना यूपीएससी, आयबीपीएस, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारख्यांचा अंदाज घेऊन ओव्हरलॅप होणार नाहीत, अशा पद्धतीने तारखा ठरवण्याचा प्रघात चालत आला आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्याची दखल घेतल्याचे यावेळी तरी दिसत नाही. विद्यार्थ्यांवर सूड उगवण्याचे काम होत आहे. एकतर जागा निघत नाहीत आणि निघल्या तर त्याचे नियोजन व्यवस्थित नसते. परीक्षा फक्त रविवारीच घ्यावी, असा काही नियम नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून परिक्षांच्या तारखा ओव्हरलॅप होत असल्याचे दिसताच आयोगाच्या परिक्षांची तारिख बदलण्याचे निर्देश दिले. जे कर्नाटक सरकार करू शकते ते महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा सवाल लोंढे यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in