

मुंबई : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळात लवकरच चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची महाभरती होणार आहे. एसटीमधील एकूण १७ हजार ७४२ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वित्त विभागाकडून या प्रस्तावाला मान्यता मिळताच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
बुधवारी विधान परिषदेत भाजपच्या श्रीकांत भारतीय यांनी एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गेली अनेक वर्षे हे कंत्राटी कर्मचारी काम करीत असून त्यांना एसटीच्या सेवेत कायम करण्याची मागणी भारतीय यांनी केली. या प्रश्नाच्या चर्चेला उत्तर देताना सरनाईक यांनी एसटी महामंडळातील भरतीची माहिती दिली.
२०२२ मध्ये एसटी महामंडळाचा मोठा संप झाला होता. त्या काळात अनेक बस स्थानकांवर गाड्या उभ्या राहिल्या होत्या आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन १ फेब्रुवारी २०२२ रोजी तातडीने निविदा प्रक्रिया राबवून काही कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती केवळ संपाच्या काळापुरती तात्पुरती होती.
संपाच्या काळात सुमारे १२ हजार ५०० बसेस होत्या, तर सध्या सुमारे १४ हजार बस उपलब्ध आहेत. दरवर्षी ५ हजार नवीन बस खरेदी करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार ८ हजार बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यापैकी ३ हजार बसचे वितरण सुरू झाले आहे. बसेसची संख्या वाढत असल्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना भरतीत प्राधान्य
एसटी संपाच्या काळात बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्या काळात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी भरती करण्यात आली होती. संप मिटल्यानंतर नियमित कर्मचारी परत आल्याने कंत्राटी कामगारांना कायम ठेवणे नियमांनुसार शक्य नसते. पण भविष्यात आपल्याला कायम नोकरी मिळेल अशी त्यांना आशा असते. त्यामुळे सरकारकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.