

मुंबई : गौरी-गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांकडून एसटी महामंडळ अतिरिक्त ३० टक्के प्रवासी भाडे आकारणार आहे. महामंडळाने यापूर्वी १३.५ टक्के कायमस्वरूपी प्रवासी भाडेवाढ करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही मिळून गणेशभक्त प्रवाशांना गावी जाण्यासाठी तब्बल ४३.५० टक्के भाडेवाढ सोसावी लागणार आहे. या भाडेवाढीचा परिवहन मंत्र्यांनी फेरविचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा इशारा दिला. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी असे म्हणते. मग प्रवाशांना का लुबाडते? असा सवाल चव्हाण यांनी केला. प्रवासी संघाच्या माध्यमातून ७०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन झाले असून सदर नियोजन एसटी महामंडळाकडे दिले आहे. एसटीच्या नियोजनाप्रमाणे ग्रुप बुकिंग १ ऑगस्टपासून व्हायला पाहिजे होते. पण ग्रुपधारकांना ३० टक्के अतिरिक्त भाडेवाढीचा झटका महामंडळाने दिला आहे. त्यामुळे ग्रुप बुकिंग सुमारे २० दिवस पुढे ढकलावे लागले.
भाडेवाढीचा फेरविचार करण्यासाठी निवेदन
३० टक्के अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीचा फेरविचार करावा, यासाठी संघाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे. प्रवासी भाडेवाढीचा फेरविचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघाने दिला आहे.