
मुंबई : कोल्हापूर येथे मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.
पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छतेसाठी कोल्हापुरात दाखल झालेल्या चमूमार्फत स्वच्छतेला सुरुवात झाली आहे. याठिकाणी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी मुंबई महापालिकेनेही खारीचा वाटा उचलला आहे.
कोल्हापूर येथे पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कोल्हापूर शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्रे मदतीसाठी देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली होती.