
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाताना मुंबईतील चाकरमान्यांची पुरती दमछाक होत असते. रस्त्यांची झालेली चाळण, अजूनही अपूर्णावस्थेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग, साडेचार महिन्यांआधीच रेल्वेची सर्व तिकिटे हाऊसफुल्ल झालेली, अशा कठीण परिस्थितीतही मुंबईकरांना आता सहजपणे कोकण गाठता येणार आहे. आता समुद्रमार्गे चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून अवघ्या साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीला पोहोचता येणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत लवकरच जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे.
लवकरच कोकणात जाण्यासाठी ‘एम टू एम’ ही हायटेक यंत्रणा असलेली बोट प्रवासांच्या सेवेत येणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या ‘एम टू एम’ या बोटीमार्फत कोकणातील हा प्रवास आणखीनच सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. याकरिता ‘एम टू एम’ ही बोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. लवकरच चाकरमान्यांना परवडतील, असे दर यासाठी निश्चित केले जाणार आहेत. मुंबईतील माझगाव डॉक येथून हा प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येईल.
येत्या रविवारी भाऊचा धक्का येथे बोट दाखल
येत्या २५ मे रोजी ‘एम टू एम’ ही बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे. जलवाहतुकीचा हा नवा पर्याय कोकणवासीयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या ‘एम टू एम’ या बोटीमार्फत पुन्हा एकदा कोकणातील जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे.