समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-भिवंडी अंतिम टप्प्याचे काम कधी होणार पूर्ण? उद्घाटन केव्हा? बघा डिटेल्स

Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : सध्या, हा महामार्ग इगतपुरी (नाशिक) ते नागपूरदरम्यान ६२५ किमी अंतरासाठी कार्यरत आहे. याआधी इगतपुरी-आमणे हा ७६ किमीचा टप्पा नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचा विचार होता. मात्र, सरकार स्थापनेतील विलंब आणि खात्यांच्या वाटपामुळे हे काम लांबले. त्यामुळे MSRDC ने सर्व प्रलंबित काम पूर्ण करून हा टप्पा एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
नागपुरातील समृद्धी महामार्गचा एंट्री पॉइंट
नागपुरातील समृद्धी महामार्गचा एंट्री पॉइंट संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, इगतपुरी ते आमणे या ७६ किमीच्या मार्गाचे काम फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शक्यतो मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा उद्घाटन सोहळा होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार अंतिम टप्पा

महामार्गावर सध्या अंतिम लेन मार्किंग आणि पेंटिंगचे काम सुरू असून, हे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पूर्ण होईल. हे काम नेहमीच बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच होते, त्यामुळे महामार्ग आता प्रवाशांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट होत आहे. उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल, अशी माहिती Hindustan Times ने दिली आहे.

इगतपुरी-नागपूर महामार्ग सुरू, आता मुंबईपर्यंत विस्तार

सध्या, हा महामार्ग इगतपुरी (नाशिक) ते नागपूरदरम्यान ६२५ किमी अंतरासाठी कार्यरत आहे. याआधी इगतपुरी-अमाणे हा ७६ किमीचा टप्पा नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचा विचार होता. मात्र, सरकार स्थापनेतील विलंब आणि खात्यांच्या वाटपामुळे हे काम लांबले. त्यामुळे MSRDC ने सर्व प्रलंबित काम पूर्ण करून हा टप्पा एकत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

समृद्धी महामार्गाचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन

७०१ किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन डिसेंबर २०२२ पासून टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे.

  • डिसेंबर २०२२ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-शिर्डी (५२० किमी) टप्प्याचे उद्घाटन केले.

  • मे २०२३ – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी-भरवीर (१०५ किमी) टप्पा उघडला.

  • मार्च २०२४ – भरवीर-इगतपुरी (२५ किमी) टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

मुंबई-नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गासाठी जोड व्यवस्था

आमणे येथे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा मुंबई-वडोदरा महामार्गाशी जोडला जाईल. तसेच, मुंबई-नाशिक महामार्गावरून समृद्धी महामार्गावर प्रवेश मिळावा यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाचे वैशिष्ट्ये आणि प्रवाशांच्या तक्रारी

२०१५ मध्ये जाहीर झालेल्या या ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. यावर ४० वर्षांसाठी टोल आकारणी होईल. महामार्गावर वेगमर्यादा १५० किमी प्रतितास ठेवण्यात आली असली तरी प्रवाशांनी फूड प्लाझा, विश्रांतीस्थळे आणि पेट्रोल पंपाच्या कमतरतेबाबत तक्रारी केल्या आहेत.

प्रवाशांसाठी १० सार्वजनिक सुविधा केंद्रांची उभारणी

MSRDC महामार्गावर १० सार्वजनिक सुविधा केंद्रे उभारणार असून, यामध्ये पेट्रोल पंप, उपाहारगृहे आणि विश्रांती केंद्रे असतील. महामार्गावर वन्यजीव अंडरपास, उड्डाण पूल आणि पादचारी पूलही आहेत, जे महामार्गाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.

मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत वेगवान आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हा महामार्ग गेमचेंजर ठरेल. आगामी टप्पा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मुंबईहूनच या महामार्गावर सहज प्रवेश मिळेल आणि संपूर्ण प्रवास अधिक सुलभ व वेगवान होईल.

logo
marathi.freepressjournal.in