मुंबई : हवामान खात्याने उत्तर कोकणातील नागरिकांना होळी साजरी करताना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या भागात तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने ४ मार्च रोजी कोकणासाठी ‘उष्ण व दमट’ हवामानाचा यलो अलर्ट जारी केला असून, संपूर्ण मार्च महिन्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे.
या भागात उन्हाळ्याचा हंगाम अधिकृतपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो आणि आता थेट मान्सूनपर्यंत उष्ण व दमट हवामानापासून दिलासा मिळणार नाही. एप्रिलमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यातर्फे मार्च-एप्रिल-मे या कालावधीसाठीच्या अंदाजानुसार, ‘या उष्ण हंगामात देशाच्या बहुतांश भागात किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत उष्णतेच्या लाटेचे दिवसही सरासरीपेक्षा अधिक असतील.’
मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या, ‘उन्हाळा सुरू झाला आहे. मार्चमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत इशारा नाही; मात्र तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटा अपेक्षित आहेत. उत्तर कोकणात मार्चच्या पहिल्या आठवड्यात उष्ण व दमट वातावरण राहील आणि त्यानुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. होळीचा सण याच आठवड्यात असल्याने नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडताना पुरेसे पाणी पिणे व आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.”
मुंबईत या आठवड्यात तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियस दरम्यान राहील. पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे काही प्रमाणात तापमानात घट होऊ शकते.