

मुंबई : शिवजयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबई आणि पुण्यातून हजारो लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे खंडाळा बोगद्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांचा खोळंबा झाला आहे. शिवजयंतीची सुट्टी (गुरुवार) आणि त्यानंतर येणारा शनिवार-रविवार, म्हणजे शुक्रवारी एका दिवसाची सुट्टी टाकल्यास, पर्यटकांना ‘लॉन्ग वीकेंड’ मिळत असल्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडण्यास सुरुवात केली. त्यामुळेच खंडाळा बोगद्याजवळ गुरुवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवासाचा वेळ कमालीचा वाढला आहे. १० ते १२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासाभराचा वेळ लागत आहे.
विशेष म्हणजे, ३ फेब्रुवारी रोज याच महामार्गावर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे तब्बल ३२ तास वाहतूककोंडी झाली होती. त्याच आठवणींनी पुन्हा एकदा वाहनचालकांच्या पोटात गोळा आला होता. हजारो प्रवासी सध्या वाहतूककोंडीत अडकून पडले असून लहान मुलांचे अन्न-पाण्यासाठी हाल होत आहेत. वाहतूक पोलीस ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत असले, तरी वाहनांची संख्या प्रचंड असल्याने त्यांना मर्यादा येत आहेत. लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे. येत्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक पोलिसांची दमछाक
गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून वाहतूककोंडीला सुरुवात झाली. वाहने अगदी धीम्या गतीने पुढे सरकत आहेत. वाहतूक पोलिसांची ही कोंडी फोडताना दमछाक होत आहे. प्रवाशांच्या नाराजीला त्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास टाळावा, असे आवाहन आता प्रशासनाकडून केले जात आहे. वीकेंडच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस वाहनांची ही गर्दी कायम राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.