एकीकडे गणेशोत्सव एकदम धामधुम मध्ये सुरु असला तरी राज्यामध्ये निवडणुकीपूर्वीचे वारे चांगलेच वाहताना दिसत आहेत. सध्या कोणत्याही पक्षाने अधिकृत भूमिका सादर केली नसली तरी, भेटीगाठी पाहता चर्चेना मात्र चांगलेच उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गट एकीकडे आपले वर्चस्व दाखवत असतानाच, राज ठाकरेंच्या हालचालींवर सर्वांची नजर आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 आणि राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आता जोर धरू लागली आहे. शिवसेनेतील बंडखोरीमुळे ही निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांची तयारी शिंदे फडणवीस सरकार करत आहे. गणपती उत्सवाची धूम आटोपल्यानंतर मंत्री आपापल्या जिल्ह्याचा दौरा करून जनतेसमोर आपल्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार असून, शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने जनतेचा कल असल्यास सरकार नोव्हेंबरमध्येच निवडणुका घेण्याचा आग्रह धरणार असल्याचे वृत्त आहे. या निवडणुकांपूर्वी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळावे यासाठी निवडणूक आयोग आणि न्यायालयात जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत.
अमित शहांच्या मुंबई भेटीने भाजपच्या गोटात सकारात्मकता
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी मुंबईला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लालबागच्या राजासोबत अनेक गणपती मंडळांना हजेरी लावली. तसेच भाजपच्या मुंबई मिशनचाही श्री गणेशा झाला. यावेळी अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संबोधितही केले. अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपने मुंबई जिंकण्यासाठी आखलेल्या मेगा प्लॅनची माहिती समोर आली आहे. यात 80-30-40 असा फॉर्म्युला अपेक्षित आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.