नागपूर : लग्नावरून परतताना काळाचा घाला, एकाच गावातील 6 जण जागीच ठार

अपघात इतका भीषण होता की क्वालिसचा अक्षरश: चुराडा, संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर...
नागपूर : लग्नावरून परतताना काळाचा घाला, एकाच गावातील 6 जण जागीच ठार

नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री ट्रक आणि क्वालिस कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

काटोल तालुक्यातील मेंढेपठार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी गावातील काहीजण नागपूरला गेले होते. रात्री क्वालिसमधून काटोलकडे येत असताना एका भरधाव ट्रकने क्वालिसला धडक दिली. समोरून धडक दिल्याने क्वालिसचा चुराडा झाला व सहा जणांचा मृत्यू झाला.

मृतकांमध्ये दोन सख्या चुलत भावांचाही समावेश आहे. अजय चिखले (वय 45), वैभव चिखले (वय 32), मयूर इंगळे (वय 36), विठ्ठल घोटे (वय 45), सुधाकर मानकर (वय 42), रमेश हेलोंडे (वय 48), अशी मृतांची नावे आहेत. तर, जगदीश ढोसे (वय ४०) जखमी आहेत. सर्व मृतक मेंढेपठार गावाचेच रहिवासी असल्याचे समजते. या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in