
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार ३८ वर्षीय फहीम शमीम खान याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. सोमवारी सकाळीच नागपूर महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) जारी केलेल्या नोटीसचे पालन न केल्यामुळे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. नोटीसमध्ये मंजूर इमारत आराखड्याचा अभाव आणि इतर बांधकामाशी संबंधित त्रुटींचा उल्लेख करण्यात आला होता.
फहीमविरुद्ध सहा गुन्हे
नागपुरातील हिंसाचाराचा कट आधीच रचला गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांच्या तपासातून फहीमने जहाल भाषण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक होऊन जमावाने काही भागातील घरे आणि वाहने जाळली, असे पोलीस तपासात आढळून आले आहे. फहीम खान नागपूरमधील संजय बाग कॉलनीतील यशोधरा नगरमध्ये राहतो. त्याने काही कट्टरपंथी लोकांना एकत्र करुन सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दरम्यान, फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत गुन्हे दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. दरम्यान, फहीम खान यशोधरानगरातून गणेशपेठेत पोहोचला कसा, याचा तपासदेखील सुरू आहे.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा ‘मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी’चा (एमडीपी) नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. लोकसभा निवडणूकीत त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती. फहीम खानच्या भाषणानंतर जमाव भडकला आणि त्यांनी मोठा हिंसाचार घडवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नागपुरातील सर्वच भागांमधील संचारबंदी हटवली
औरंगजेबाच्या कबरी उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिल्यानंतर नागपुरात दंगल उसळली होती. या दंगलीच्या घटनेनंतर नागपुरातील एकूण ११ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. यातील काही ठिकाणाची संचारबंदी गुरुवारी उठवण्यात आली होती. आता रविवारी नागपुरातील सर्वच भागांमधील संचारबंदी उठवण्यात आली आहे. तसे आदेश नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत. रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून नागपुरातील संचारबंदी संपूर्णत: उठविण्यात आली आहे.