सोलापूर/पंढरपूर : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुरू गोविंदसिंग, संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. मीराबाई, नरसी मेहता यांच्या काव्यातदेखील नामदेव महाराजांचे विचार पहायला मिळतात. भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खऱ्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
संत नामदेव महाराजांनी देशातील २२ राज्यात भ्रमण करून भागवत धर्माचा विचार पोहोचविला. परकीय आक्रमणाच्यावेळी समाजात श्रद्धा निर्माण करण्याचे आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेची गंगा मराठीत आणली, त्याला नामदेव महाराजांच्या तत्वज्ञानाचे अधिष्ठान लाभले. या दोघा संतांची भेट वारकरी संप्रदायात अमूल्य विचारांचा संगम म्हणून पाहिले जाते.
संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हृदयद्रावक दृष्य वर्णन केले. त्यांनी पुंडलिकांपासून जनाबाईपर्यंत भक्तांची चरित्रदेखील लिहिली. आपल्या इतिहासातले पहिले चरित्रलेखक संत नामदेव महाराज होते. त्यांच्या साहित्यात संवाद आहे, नाट्य आहे, अखिल मानवेतेचा विचार करून निर्माण केलेले हे साहित्य आहे. श्रीकृष्णाच्या लीला मराठीत सांगतांना त्यांनी बालकविताही लिहिल्या आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आचार्य तुषार भोसले, अभिनेता गोविंदजी नामदेव, ह.भ.प. केशव महाराज नामदास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सचिव रुपेश खांडके व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मराठी गजल काव्य प्रकाराचे मूळही संत नामदेवांपर्यंत पोहोचते. ब्रज भाषा आणि शौरसेनी भाषा त्यांना अवगत होत्या. भाषा हे संवादाचे साधन आहे, विवादाचे नाही, हे त्यांनी दाखवून दिले. भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे हे त्यांनी जाणून घेतले होते. म्हणून शीख धर्मात सर्वोच्च स्थानी असलेल्या गुरू ग्रंथसाहीबमध्ये ६१ पदे संत नामदेवांची आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंढरपूरचा विकास होऊन भव्य कॉरिडोरची निर्मिती करण्यासाठी नागरिकांना विश्वासात घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी भव्य स्मारक पंढरपूर येथे उभे रहावे आणि संत नामदेव महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मारकासाठी १५० कोटींचा निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतल्याचे त्यांनी सांगितले. संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे.
जयकुमार गोरे, पालकमंत्री
भाविकांसाठी व्हीआर गॉगलची सुविधा
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास व शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्हीआर गॉगलद्वारे पाहता येणार आहे. अल्प शुल्क असलेल्या या सुविधेमुळे भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभे राहून समक्ष पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे. भाविकांना या महापूजेस उपस्थित राहण्याची इच्छा असल्याने या गॉगलच्या माध्यमातून या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.
हा भाग्याचा क्षण
संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधीच्या निमित्ताने नामदेव पायरीचे दर्शन घेणे आणि तिथली ऊर्जा प्राप्त करून घेणे हा भाग्याचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या पायरीच्या दर्शनाने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. नामदेव महाराजांच्या अभंगात ‘पायरिचे चिरे’ असा उल्लेख आहे, त्यानी याच भावनेने आपले कार्य केले. भागवत धर्माचा विचार हा वैश्विक विचार आहे, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले.