राज्यात आलेल्या अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, " नियम अटी, पंचनामे..."

राज्यात आलेल्या अवकाळीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले, " नियम अटी, पंचनामे..."

अवकाळी आलेल्या वादळी पावसाने कापूस, तूर, सोयाबीन, द्राक्षे, आंबा, डाळिंब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास एक लाख हेक्टरवरील पीकांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ हजार रुपये व बागायती शेतीची नुकसान भरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. बळीराजा हा सातत्याने संकटाच्या दुष्टचक्रात भरडला जात आहे. यावर्षी सुरुवातील कमी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. खरिप पुरता वाया गेला आणि आता रब्बी हंगामानेही घात केला आहे. शेतकऱ्याचे हे वर्षच नुकसानीचं ठरलं आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतातील पिके वाया गेली आहेत. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

अवकाळी आलेल्या वादळी पावसाने कापूस, तूर, सोयाबीन, द्राक्षे, आंबा, डाळिंब, पपई, केळी, ऊस, संत्रा या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या वादळी पावसाची झळ बसली आहे. तसंच इतरही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसला आहे. विशेषत:विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात या अवकाळी आलेल्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. तसंच पुणे, नगर आणि नाशिकमध्ये या वादळीपासामुळे फळबागा उद्धवस्थ झाल्या आहेत.

शेतकरी जगला तरच आपण जगू, आपली अन्नधान्याची गरज भागवणारा बळीराजा निसर्गामुळे हतबल झाला आहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना आता अवकाळी व गारपिटीने पुरता हतबल झाला आहे. सरकारने शेतकऱ्याला तात्काळ मदत करुन आधार दिला पाहिजे. पिकविमा कंपन्यांकडूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असं नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in