नांदेड : महिला या समाजातील प्रमुख घटक असून लोकशाही बळकटीकरणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृतीच्या नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी केले. त्यांच्या आवाहनानुसार सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक महिलांनी प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वडेपुरी येथे आयोजित सह्याद्री आदर्श प्रभाग संघाच्या वतीने मतदार शपथ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी आडेराघो, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, गट शिक्षणाधिकारी एन. एम. वाघमारे, अंबलवाड यांची उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या की, मागच्या वेळी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ६५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून महिलांनीही यात पुढाकाराने शंभर टक्के मतदार करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.