नंदूरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण; गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार

नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या मूक मोर्चाला बुधवारी हिंसक वळण लागले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाहनांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज व अश्रूधूराचा वापर केला. मात्र आंदोलकांनी दगडफेक करत आक्रमक भूमिका घेतल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण राहिली. या घटनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नंदूरबारमध्ये मोर्चाला हिंसक वळण; गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार
Published on

नंदूरबार : नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या मूक मोर्चाला बुधवारी अचानक हिंसक वळण मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मात्र काही आंदोलकांनी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली होती. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नंदुरबार शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरुणाचा १७ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनांच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. सर्व काही शांततेत सुरू असताना, मोर्चा संपण्याच्या वेळेला या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील इतर शासकीय आवारांमध्ये उभ्या असलेल्या आठ ते १० वाहनांची तोडफोड केली. काही वाहने उलटविण्यात आली. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर जमावातील उपद्रवी लोक पांगले.

जय वळवीचा हल्ल्यात मृत्यू झाल्यामुळे आदिवासी समाजामध्ये असंतोष होता. जय वळवीच्या मारेकऱ्याविरुध्द कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आदिवासी संघटनांच्यावतीने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सुमारे १५ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. मृत जय वळवीचे नातेवाईक आणि काही जण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले असताना, मोर्चातील काही उपद्रवींनी बळजबरीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना रोखले.

हिंसाचारात तीन जण जखमी

काही उपद्रवींनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारासह इतर शासकीय कार्यालयांच्या परिसरात असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास आणि ती उलटवून देण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ता असे तीन जण जखमी झाले. दरम्यान, मयत वळवी यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

logo
marathi.freepressjournal.in