नारळी पौर्णिमेला रंगते नारळ फोडीची रंगत; कोकणच्या मातीत जपली जाते परंपरा

श्रावण पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात समुद्राला नारळ अर्पण करून सुख-समृद्धी, सुरक्षितता आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. याच दिवशी कोकणातील अनेक गावांमध्ये पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात नारळ फोडीची स्पर्धा हे विशेष आकर्षण ठरते.
नारळी पौर्णिमेला रंगते नारळ फोडीची रंगत; कोकणच्या मातीत जपली जाते परंपरा
नारळी पौर्णिमेला रंगते नारळ फोडीची रंगत; कोकणच्या मातीत जपली जाते परंपराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

धनंजय कवठेकर/रायगड

कोकण आणि समुद्राचे नाते अतूट आहे. अथांग समुद्र, नारळी-पोफळीच्या बागा, माडांच्या सावल्या आणि समुद्राशी जोडलेले मच्छीमारांचे जीवन ही कोकणच्या लोकसंस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. समुद्राशी असलेले हे नाते अधिक दृढ करणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. श्रावण पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात समुद्राला नारळ अर्पण करून सुख-समृद्धी, सुरक्षितता आणि भरभराटीची प्रार्थना केली जाते. याच दिवशी कोकणातील अनेक गावांमध्ये पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यात नारळ फोडीची स्पर्धा हे विशेष आकर्षण ठरते.

मच्छीमार समाजासाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीचा हंगाम काही काळ थांबलेला असतो. नारळी पौर्णिमेनंतर समुद्राची पूजा करून नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. समुद्र शांत राहावा, मुबलक मासळी मिळावी आणि मच्छीमार सुखरूप घरी परतावेत, अशी प्रार्थना यावेळी केली जाते.

पूर्वी पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांमध्ये आता महिलांचाही सहभाग वाढत आहे. महिलांसाठी स्वतंत्र नारळ फोडी तसेच इतर पारंपरिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. महिला आणि तरुणींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या परंपरेला नवी ऊर्जा मिळत आहे.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी किनारी गावांमध्ये सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण असते. मच्छीमार आपल्या होड्या आणि नौकांची पूजा करतात. होड्यांना फुले, पताका आणि रंगीबेरंगी सजावट केली जाते. नारळ, फुले, हळद-कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. कुटुंबाचे सुख-समाधान आणि वर्षभर सुरक्षित मासेमारी व्हावी, या भावनेने समुद्राला नारळ अर्पण केला जातो.

नव्या पिढीला परंपरेची ओळख

डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक मनोरंजनाच्या साधनांमुळे पारंपरिक खेळ मागे पडण्याची शक्यता असताना नारळी पौर्णिमेच्या माध्यमातून हे खेळ आजही जिवंत ठेवले जात आहेत. नारळ फोडीची स्पर्धा केवळ करमणुकीचे साधन नसून नव्या पिढीला लोकपरंपरा, संस्कृती आणि सामुदायिक जीवनाशी जोडणारा दुवा ठरत आहे.

भंडारी समाजाचे योगदान

कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या भंडारी समाजाने नारळ फोडीच्या या पारंपरिक खेळाला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून समाजातील विविध मंडळे, संस्था आणि युवकांच्या पुढाकाराने अनेक गावांमध्ये नारळ फोडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in