नारायण राणे यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाले, "९६ कुळी मराठ्यांची..."

जरांगेंच्या उपोषणाबाबत मुंबई पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन मोठं वक्तव्य केलं.
नारायण राणे यांचं मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाले, "९६ कुळी मराठ्यांची..."

सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत मुंबई पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन मोठं वक्तव्य केलं आहे.

नारायण राणे म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण समाप्त केल्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करतो. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे उपोषण केलं त्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. "

मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती. आता जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. यापूर्वीही मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. अनेकांनी आरक्षणाबाबत टीका देखील केली., असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

सरसकट कुणबी दाखले करु नका. राज्य सरकारने घटनेतील १५/४ चा अभ्यास करावा. ९६ कुळी मराठ्यांची सरसकट कुणबी दाखले ही मागणी नाही. राज्यात ३८ टक्के मराठा समाज आहे जो गरिब आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाचेही आरक्षण काढून हे आरक्षण देऊ नये, असं राणे म्हणाले.

सरकारला घटनेने तरतूद केल्याप्रमाणे आरक्षण देण्याचा अधिकार आहे. इतिहासाची जाण असणाऱ्यानेच या विषयावर बोलावं. यापूर्वी आरक्षण देण्यात आलं होतं तेव्हा मराठाच मुख्यमंत्री होते. मराठ्यांना आरक्षण देताना द्वेषाची भावना असून ये, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in