
नाशिक : जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील ताहाराबाद-अंतापूर मार्गावर गुरुवारी (दि. ११ ) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे बारा जण जखमी झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
वाहतूक पूर्णतः ठप्प
गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर ताहाराबाद - अंतापूर मार्गावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दोन तासानंतर ती सुरळीत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले.
आ. बोरसे यांची भेट
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मदतकार्याचा आढावा घेतला आणि जखमींवर योग्य उपचार होण्यासाठी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या.