

नाशिक : जन्मदात्या आईने आपल्या बारा पैकी सहा मुलांना विकल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात महिला आणि तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याच्या वाडीत हा प्रकार उघड झाला आहे. महिलेची चौदावी प्रसूती झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही वार्ता एका आशासेविकेमुळे पुढे आली. संबंधित महिलेची प्रसूती झाल्यापासून आशा कार्यकर्तीची नेमणूक करण्यात आली होती. बाळ सुरक्षित घरी आणले गेले होते. मात्र, काही दिवसांनी आशा कार्यकर्ती बाळाचे वजन घेण्यासाठी गेली असता, त्यांना ते बाळ तिथे आढळले नाही. या संदर्भात आईला विचारणा केली असता आधी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, आशासेविकेने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर महिलेने कबुली दिली. आम्हाला मुलांना पोसणे परवडत नाही, म्हणून आम्ही त्यांना दत्तक म्हणून दिले, असे उत्तर संबंधित महिलेने दिले. बाळाला दूध पाजणे शक्य नव्हते आणि आर्थिक अडचणींमुळे तिने हा निर्णय घेतला. मुलांच्या संख्येबाबत विचारले असता, तिने एकूण १२ मुले होती, त्यापैकी सहा जणांना विकल्याचा दावा आहे.
या प्रकाराची प्रशासकीय स्तरावर गंभीर दाखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करीत महिलेसह तीच्या पतीला ताब्यात घेतले.