

नाशिक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम होऊन नाशिकच्या काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षाचे लिंबू-मिरची काढून टाकले. पुन्हा कधीही न लावण्याचा निर्धार केला.
महाराष्ट्र अंनिसच्या वतीने नाशिकमध्ये नुकतीच फलज्योतिष व बुवाबाजीविरोधी संघर्ष राज्य परिषद उत्साहात संपन्न झाली. सिटु भवनजवळ काही रिक्षाचालक भाड्याच्या प्रतीक्षेत आले होते. उत्कंठा म्हणून काही रिक्षाचालक या परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेमध्ये सांगितले गेले की, अंधश्रद्धेपासून दूर रहा. ‘लिंबू-मिरची तोडा, मंत्र-तंत्र सोडा, विवेकाशी नाते जोडा’ असे एक घोष वाक्य त्या ठिकाणी लावले होते.
नाशिकमधील चांडक सर्कलजवळ काही रिक्षाचालकांनी स्वतःहून एकत्र येत, स्वतःच्या रिक्षाला बांधलेले लिंबू-मिरची, काळी बाहुली तोडली. तसेच यापुढे अशा अंधश्रद्धा व दैवी तोडगे यावर आम्ही विश्वास ठेवणार नाहीत, रिक्षांना अशा वस्तू बांधणार नाहीत असे जाहीर केले, तशी प्रतिज्ञा घेतली.
अशा अंधश्रद्धांचा आजपासून आम्ही त्याग करीत आहोत आणि आमच्या इतर रिक्षाचालकांनाही असे आवाहन करू, असा निर्धार केला. लिंबू-मिरची हे खाण्याचे पदार्थ असून त्यांचा भलेबुरे होण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे रिक्षाला नजर लागणे, दुष्ट लागणे किंवा होणारा अपघात टळणे या गोष्टी होण्याचा आणि लिंबू-मिरची बांधण्याचा काहीच संबंध नाही, हे आमच्या लक्षात आले, असेही त्यांनी पुढे सांगितले.
रिक्षाला नजर न लागणे किंवा अपघात न होणे याचा लिंबू-मिरचीचा काहीही संबध नसल्याचे आम्हाला अंनिसच्या कार्यक्रमामुळे समजले. अपघात न होण्यास वाहतुकीचे नियमित पाळणे आवश्यक आहे, हे आम्हाला पटले आहे.
शरद भामरे, रिक्षाचालक