मुंबई : महाराष्ट्रातील सहा जणांसह देशभरातील ८१ शिक्षकांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा' ने शुक्रवारी सन्मान करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ४५ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक आणि १६ कौशल विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान केला. प्रमाणपत्र, रौप्य पदक आणि ५० हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये शालेय शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वक्रिउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. २, मुंबई) यांच्यासह उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर), डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई), प्रा. पुरुषोत्तम पवार (एस. व्ही. पी. एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंग, बारामती), आणि कौशल्य विकास क्षेत्रातील अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर) यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते.
मुलांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस – राष्ट्रपती
पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'आचार्य देवो भव' या उक्तीचा उल्लेख करत शिक्षकांचे समाजातील सर्वोच्च स्थान अधोरेखित केले. शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. मुलांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे, असे त्या म्हणाल्या. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी एसटीईएम क्षेत्रातील मुलींच्या ४३ टक्के नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले. भारताला कौशल्याच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि महासत्ता बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे त्यांनी सांगितले.