महागाई विरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विधिमंडळासमोर निदर्शने करण्यात आली. विधिमंडळ ते राजभवनापर्यंत हा मोर्चा निघाला होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना अटक केली. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आल्याचे काँग्रेसने ट्विट केले आहे. आम्ही ईडी सरकारच्या दबावापुढे झुकणार नाही, जनतेचे प्रश्न मांडण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही, असेही काँग्रेसने या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेसने आपल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना विधानभवन परिसरातून ताब्यात घेतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांना ताब्यात घेतल्याचे नमूद करण्यात आले.
मोदींच्या महागाई आणि दडपशाहीचा निषेध – यशोमती ठाकूर
काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या, "केंद्रातील मोदी सरकार गैरव्यवहार करून सर्वसामान्यांना त्रास देत आहे. हे सरकार शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करत आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. मोदींच्या महागाईच्या धोरणाचा आणि दडपशाहीचा आम्ही जाहीर निषेध करतो.