नक्षलवाद्यांच्या तीन राज्यांच्या समितीची विनंती; १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ द्या, आम्हीही शरण येणार!

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेली नक्षलमुक्त भारताच्या ‘डेडलाईन’ला अवघ्या चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

गडचिरोली : नक्षल संघटनेचा म्होरक्या भूपती आणि रूपेशचे शेकडो सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण व त्यानंतर सहा दिवसांपूर्वी चकमकीत हिडमाचा झालेला मृत्यू. यामुळे धास्तावलेल्या नक्षलवाद्यांच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड (एमएमसी) समितीने तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे आत्मसमर्पणासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची वेळ मागितली आहे. ‘एमएमसी’चा प्रवक्ता अनंत याने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेली नक्षलमुक्त भारताच्या ‘डेडलाईन’ला अवघ्या चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईत ३५० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहे. यात महासचिव बसवराजू आणि हिडमासह सहा केंद्रीय समिती सदस्यांचा समावेश आहे. सोबतच भूपती आणि रूपेशसारख्या वरिष्ठ नेत्यांनी शेकडो सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे.

मुदतीची विनंती

तत्पूर्वी शांतता चर्चा आणि शस्त्रसंधीवरून नक्षल संघटना दोन गटात विभागली गेली होती. मात्र, हिडमाच्या मृत्यूनंतर उर्वरित नेते दहशतीत असून लवकरच तेही आत्मसमर्पण करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, नक्षल्यांच्या ‘एमएमसी’ विशेष विभागीय समितीने एक पत्रक जारी केले असून त्यांनी यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा उल्लेख करून आत्मसमर्पणासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वेळ देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

पीएलजी सप्ताह

भूपती आणि चंद्रन्नासारख्या मोठ्या म्होरक्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यामुळे आमच्यापुढे आत्मसमर्पणाशिवाय पर्याय नाही. परंतु समितीतील इतर सदस्यांना हा निर्णय कळवण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. अनेक सदस्य भूमिगत असल्याने त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठीही वेळ लागणार आहे. त्यामुळे आम्हाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुभा हवी आहे. या काळात आम्ही कुठली हिंसा करणार नाही. ‘पीएलजी’ सप्ताह पाळणार नाही, असेही समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन राज्यातील प्रमुख यावर काय निर्णय घेणार याकडे सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

‘एमएमसी’ समितीत कोण?

नक्षल संघटनेची महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तीन राज्य मिळून विशेष विभागीय समिती आहे. एकेकाळी मिलिंद तेलतुंबडेकडे या समितीचे नेतृत्व होते. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर केंद्रीय समिती सदस्य रामधेर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये एटापल्ली तालुक्यातील जहाल महिला सदस्य रानू आणि उमेश वड्डे याच्यासह २० ते २५ सदस्य आहेत. त्यामुळे यातील किती जण आत्मसमर्पण करणार, हे पत्रकात स्पष्ट करण्यात आलेले नाही.

logo
marathi.freepressjournal.in