विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत, 'छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते' असे विधान केले. यानंतर त्यांच्या या विधानाचा भाजपसह शिंदे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला. आज राज्यभर त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, आधी महाविकास आघाडीकडून भाजपवर महापुरुषांचा अवमान केल्याबद्दल निशाणा साधला गेला. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आता त्यांच्याविरोधात भाजपसह शिंदे गटाचे नेते, कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरले आहेत.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांविरोधात जोरदार निदर्शने
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसेच, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या 'सहयोग' या निवासस्थानासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, भिगवण चौकातही त्यांनी निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
पुणे, धुळे, नाशिकमध्येही अजित पवारांविरोधात निदर्शने
भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी धुळ्यामध्ये अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा नदीत सोडून निषेध व्यक्त केला. तर, नाशिकमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही यावेळी करण्यात आले. यावेळी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. भाजपसह शिंदे गटानेदेखील जोरदार आंदोलने केली. शिंदे गटाचे महानगरप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फलकाला जोडो मारो आंदोलन केले.