विधान परिषदेची उमेदवारी ठरवणार रायगडचा पालकमंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची चर्चा राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपपेक्षा अधिक होत आहे. कारण आहे ते रायगड-रत्नागिरी विधान परिषदेची उमेदवारी.
विधान परिषदेची उमेदवारी ठरवणार रायगडचा पालकमंत्री
विधान परिषदेची उमेदवारी ठरवणार रायगडचा पालकमंत्रीसंग्रहित छायाचित्र
Published on

पेण : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांची चर्चा राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपपेक्षा अधिक होत आहे. कारण आहे ते रायगड-रत्नागिरी विधान परिषदेची उमेदवारी.

रायगड - रत्नागिरी मतदारसंघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रतिष्ठेच्या जागेवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुतीमधील मित्रपक्ष शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष उभा राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. परिणामी यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत असणारा पेच सुटण्याची ही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी आपापल्या मुलांच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

मंत्री भरत गोगावले यांनी त्यांचे पूत्र विकास गोगावले यांना उमेदवारी मिळण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सध्यातरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘वेट अँड वॉच’ अशी संयमाची भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या बाजूला खासदार सुनील तटकरे यांनी आपला मुलगा अनिकेत तटकरे याच्यासाठी हीच जागा पदरात पाडून घेण्याकरिता राजकीय ताकद पणाला लावली आहे.

विधान परिषदेची उमेदवारी ठरवणार रायगडचा पालकमंत्री
संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची १६ जागांची निवडणूक येत्या काळात होणार आहे. या १६ जागांपैकी रायगड-रत्नागिरीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीला रायगड-रत्नागिरीची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा सोडण्यास रायगडमधील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचे दिसत आहे. मात्र, यावर तोडगा म्हणून रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला देण्याच्या हालचाली भाजप पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून होत असल्याचे दिसत आहे. रायगड-रत्नागिरी जिल्ह्याची विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे लढवण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील प्राथमिक चर्चा ही राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. अडीच वर्षांपासून पालकमंत्रीपदाचं घोंगडं भिजत, पडलेलं असतानाच आता अखेर यावर कोणत्या स्वरुपात तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यात अंतर्गत सुरू असलेले धुसफूस पाहता रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचा महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न विरोधक जोरदारपणे करताना दिसत आहेत. याचा फटका आदिती तटकरे यांना बसू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in