

मुंबई : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन यांनी आपला अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षाकडून अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे.
राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी शेवटच्या दिवशी जैन यांच्यासह आणखी एका हौशी उमेदवाराने अर्ज भरला आहे. परंतु, या अर्जावर अनुमोदक आणि सूचक यांच्या सह्या नसल्याने हा अर्ज छाननीत बाद होईल. प्राप्त उमेदवारी अर्जांची मंगळवारी छाननी होईल.
या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ११ जून अशी आहे. त्यामुळे ही मुदत संपल्यानंतर जैन यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाईल. दरम्यान, जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, भरत गोगावले, माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील, खासदार पार्थ पवार, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी खासदार समीर भुजबळ आदी उपस्थित होते.