राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभा नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. मात्र, हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, शिवाय त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. दिवसभरात कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. स्वत: आव्हाड यांनी वाढदिवस साजरा न करता अज्ञात ठिकाणी जाण्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, उद्या ५ ऑगस्ट... माझा वाढदिवस... लोक मोठ्या उत्साहाने मला भेटायला येतात, मला शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते खूप हृदयस्पर्शी असते. मला यादिवशी पूर्ण वर्षाचे बळ मिळते. पण मला माफ करा. या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि माझा वाढदिवसही साजरा करणार नाही.
आव्हाड यांनी काय कारण दिले?
देशातील लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रातील पक्षांची फूट, मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, महाराष्ट्रात दलित आणि मागासवर्गीयांवर होणारे वाढते अत्याचार या कारणांमुळे आव्हाड यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे म्हटले आहे.