

मुंबई: नीट पेपरफुटीचा फटका राज्यातील ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला बसला आहे. नीट फेरपरीक्षेचा निकाल लांबल्यास राज्यातील ९ अभ्यासक्रमांचे प्रवेश जागा रिक्त ठेवून करण्यात येतील तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश वेळेत होणार असल्याचे सीईटी कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नीट परीक्षेचे गुण कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, चर्म तंत्रज्ञान, वेष्टन तंत्रज्ञान, औषध अभियांत्रिकी, मुद्रण अभियांत्रिकी, फॅशन तंत्रज्ञान आणि वस्त्र रसायनशास्त्र या ९ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑल इंडिया कोटा (१५ टक्के) ग्राह्य धरण्यात येतात. हे ९ अभ्यासक्रम १७ शासनमान्य संस्थांमध्ये आहेत.
प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम नको!
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील तांत्रिक व्यावसायिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून जाहीर होणाऱ्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया आयोजित करण्यात येतील, तर नीट पुनर्परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब झाल्यास नऊ अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये १५ टक्के अखिल भारतीय कोट्यातील जागांचा समावेश न करता त्या जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येतील, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबतचा संभ्रम बाळगू नये, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.