निळजे-काटई पलावा उड्डाणपुलाचा गोंधळ; उद्घाटनाच्या काही तासांतच बंद

निळजे-काटई पलावा उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा शिवसेना (शिंदे गट) तर्फे शुक्रवारी ४ जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडला. मात्र या उद्घाटनाच्या अवघ्या काही तासांतच प्रशासनाने पूल तात्काळ बंद केला.
निळजे-काटई पलावा उड्डाणपुलाचा गोंधळ; उद्घाटनाच्या काही तासांतच बंद
Published on

बिवली : निळजे-काटई पलावा उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा शिवसेना (शिंदे गट) तर्फे शुक्रवारी ४ जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडला. मात्र या उद्घाटनाच्या अवघ्या काही तासांतच प्रशासनाने पूल तात्काळ बंद केला. पुलावरील रस्त्यावर ऑइलमुळे घसरटपणा निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढल्याने वाहतूक बंद करण्यात आली, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या घडामोडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व मनसेने तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत तीव्र निषेध व्यक्त केला.

काम अर्धवट असतानाही पूल सुरू केला, दुचाकीस्वार पडले, अपघात झाले आणि दोन तासांत पूल बंद! या निष्काळजीपणाविरोधात शिवसैनिक मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार आहेत.

दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख ठाकरे गट

पलावा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. आम्ही याची चौकशी करण्याची मागणी केली होती. पण ‘इन्फ्रास्ट्रक्चर मॅन’ म्हणवणारे कोणताही तपास न करता पूल उघडून मोकळे झाले आणि काही वेळातच पूल बंद. हे नक्की काय गोंधळ आहे?

राजू पाटील, मनसे नेते

पूल बंद केल्यानंतर ठाकरे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, तालुकाप्रमुख विजय भोईर, संघटक सदाशिव गायकर आणि शिवसैनिकांनी पुलाची पाहणी केली. पूल उघडला म्हणून आनंद झाला होता, पण चारचाकी- दुचाकी थरार अनुभवत गेला. अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in