चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्यानंतर आग लागली. या आगीत नऊ जण होरपळून मृत्यू पावले.
मूल-चंद्रपूर येथील अग्निशमन पथकांनी सकाळपर्यंत ही आग विझवली. आगीमुळे मृतदेहांची राख झाली होती. प्लास्टिक पोत्यांमधून हे शव चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये टँकरचा चालक हाफीज खान (रा. अमरावती) आणि वाहक संजय पाटील (रा. वर्धा) यांचा समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील सात जणांचा अपघातात जळून कोळसा झाला.
आगीमुळे वाहतूककोंडी
या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने वाहतूक खंडित झाली. आगीच्या उंच ज्वाळांनी लगतच्या जंगलातील झाडेही आगीच्या विळख्यात सापडली. या अपघाताची माहिती मिळताच मूल-चंद्रपूर येथून अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी पहाटेपर्यंत आग नियंत्रणात आणली. या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.