
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भर पावसात विधानभवनाच्या प्रांगणात आपल्या मतदार संघात एमआयडीसी आणण्यासाठी आंदोलन केलं. रोहित पवार यांनी ज्या जागेवर एमआयडीसी आणण्याची मागणी केली ती जागा पीएनबीला कोट्यवधींचा चूना लावून पळालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदाराने हा दावा केला असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भाजप नेते राज शिंदे यांनी याबाबतचा दावा केला आहे. विधान परिषदेत चर्चा करताना त्यांनी म्हटलं की, या भागात एमआयडीसी व्हावी यात कुणाचेही दुमत नाही. पण याच जागेवर एमआयडीसीचा आग्रह का धरला जात आहे. या ठिकाणच्या जमिनींच्या मालकांचं नाव हे नीरव दिपक मोदी, मनिषा कासोले, नयन आग्रवाल, पंकज विनोद खन्ना, कमलेश शाह, गणेश आग्रवाल अशी आहेत. त्यामुळे येथील एमआयडीसी येथील बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी करत आहात की उद्याजोक आणि गुंतवणुकदारांच्या भल्यासाठी करत आहात, असा सवाल देखील राम शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कंपन्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा करत आहेत. हे उद्योजक जर कर्जतमधील भविष्यात होणाऱ्या एमआयडीसीत येण्यास तयार असतील तर त्यांना जामखेडचा रस्ता सापडत नाहीत का ? जामखेडमध्ये एमआयडीसी होऊन २५ वर्ष झाली, पण अजून एकही उद्योग आला नाही, हे देखील राम शिंदे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी जामखेड एमआयडीसीत उद्योग आण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. तसंच २०१६ साली कर्जतमध्ये एमआयडीसी साठी पहिली बैठक पार पडली. याता याठिकाणच्या जमिनींचे मालक जर नीरव मोदी व आग्रवाल असणार असतील तर हे सर्वकाही धक्कादायक आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची आहे. हा तो लंडनला पळालेला निरव मोदीच आहे का? याची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.