

सिंधुदुर्गनगरी : देशभरात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence एआय) प्रणालीचा प्रभावी वापर करून शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि जनताभिमुख करण्याचा आदर्श ठरलेला सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा बनला आहे. या उपक्रमाची दखल घेत नीती आयोगाच्या टीमने या प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी दोन दिवसांचा दौरा सुरू केला असून गुरुवारी ती जिल्ह्यात दाखल झाली.
दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या नीती आयोगाच्या टीममध्ये डॉ. देवव्रत त्यागी आणि विदिशी दास या वरिष्ठ सदस्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः उपस्थित राहून या दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले.
पहिल्या दिवशी टीम सदस्यांना जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘एआय’ प्रणालीची सविस्तर माहिती देण्यात आली. पुढील दोन दिवसांत हे सदस्य विविध शासकीय विभागांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून माहिती संकलित करणार आहेत.
या अभ्यास दौऱ्यानंतर नीती आयोगाकडून तयार करण्यात येणारा अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. या अहवालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एआय प्रणालीची अंमलबजावणी, त्याचे परिणाम आणि भविष्यातील संभाव्यता यांचा समावेश असेल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि परिणामकारक बनवून देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तंत्रज्ञानावर आधारित हा प्रयोग आता देशातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, शासन व्यवस्थेतील कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
