जो करेल जातीची बात, त्याला मारेन लाथ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बेधडक वक्तव्य

मी राजकारणात आहे आणि इथे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. पण मी माझ्या पद्धतीने गोष्टी करायचे ठरवले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या वातावरणावर संताप व्यक्त केला.
जो करेल जातीची बात, त्याला मारेन लाथ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बेधडक वक्तव्य
Published on

नागपूर : अनेक जातीचे लोक मला भेटायला येत असतात. मी त्या सर्वांना सांगितले की, जो करेल जातीची बात, त्याला मारेन लाथ! आम्ही कधीही जात किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. मी राजकारणात आहे आणि इथे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. पण मी माझ्या पद्धतीने गोष्टी करायचे ठरवले आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या वातावरणावर संताप व्यक्त केला.

नागपूरमध्ये एका दीक्षांत समारंभात नितीन गडकरी म्हणाले की, “मला कोण मतदान करेल, याची मला चिंता नाही. मी सार्वजनिक ठिकाणी धर्म आणि जातीबद्दल बोलत नाही. समाजसेवा प्रथम हे माझे तत्त्व आहे. मी निवडणूक हरलो किंवा माझे मंत्रिपद गमावले तरी मी या तत्त्वावर ठाम राहीन. माझ्या अनेक मित्रांनी सांगितले की, सार्वजनिक जीवनात असताना तुम्ही हे बोलायला नको होते. पण मी आयुष्यात हे तत्त्व पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मी निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तरी मी मरणार नाही.”

मुस्लिम समाजाला शिक्षणाची जास्त गरज

“इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची जास्त गरज आहे. दिवसातून एक वेळा नाही तर १०० वेळा नमाज पठण करा. मात्र, नमाज पठणाबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचे आहे. इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस तयार झाले तरच समाजाचा विकास होईल. कोणताही माणूस हा त्याच्या जात, पंथ, भाषा, लिंग आणि धर्मामुळे नव्हे, तर त्याच्या गुणांमुळे ओळखला जातो,” असेही गडकरी यांनी सांगितले.

“मी आमदार असताना ‘अंजुमन-ए-इस्लाम इन्स्टिट्यूट (नागपूर) इंजिनिअरिंग कॉलेज’ला परवानगी दिली होती. मुस्लिम समाजाला याची गरज आहे, असे मला वाटत होते. मुस्लिम समाजातून अधिकाधिक अभियंते, आयपीएस, आयएएस अधिकारी निर्माण झाले तर सर्वांचा विकास होईल. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे. अंजुमन-ए-इस्लामच्या बॅनरखाली आज हजारो विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत,” असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in