रात्रीच्या काळोखात ६८ कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास; ५२ दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर, ६० पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा

किहिम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची ६८ पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झाल्याचे मनमोहक चित्र पहावयास मिळाले. अखेर तो दिवस क्षण जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहिम ग्रामस्थांनी जल्लोष करीत साजरा केला.
रात्रीच्या काळोखात ६८ कासवांच्या पिल्लांचा समुद्राकडे प्रवास; ५२ दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर, ६० पिल्ले बाहेर येण्याची प्रतीक्षा
धनंजय कवठेकर / अलिबाग
Published on

धनंजय कवठेकर / अलिबाग

किहिम समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची ६८ पिल्लांचा रात्रीच्या अंधारात समुद्राकडे प्रवास सुरू झाल्याचे मनमोहक चित्र पहावयास मिळाले. अखेर तो दिवस क्षण जवळ आल्यानंतर या क्षणाचा आनंद किहिम ग्रामस्थांनी जल्लोष करीत साजरा केला. मागील अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासव मुंबई आणि अलिबागच्या समुद्रकिनारी नाहीशी होत असल्याची चर्चा होती, मात्र आजच्या घटनेने येथील पर्यावरणात रक्षण करण्याची क्षमता असल्याचे दिसून आले.

मागील ५२ दिवस किहिम ग्रामस्थ आणि वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र या घरट्यांचे रक्षण करीत होते आणि तो क्षण शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता जवळ आला, याच दरम्यान घरट्यात हालचाल होत असल्याचे रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर एकएक पिल्लू घरट्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. ८.०० वाजेपर्यंत ६८ पिल्ले बाहेर आली होती, या सर्वांना किहिमचे सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड, दक्षिण कोकण विभागीय वनअधिकारी कांचन पवार, कांदळवन कक्षाचे वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या हस्ते समुद्रात किहीम समुद्र समुद्रात सोडण्यात आले. अद्याप साधारण ६० पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे. या पिल्लांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाईल, असे किहिम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद (पिंट्या) गायकवाड यांनी सांगितले. येथील समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता ठेवण्यात यश येत असल्याचे हे उदाहरण असल्याचे म्हटले जात आहे.

एकेकाळी अलिाबगच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात ऑलिव्ह रिडले जातीची कासव अंडी घालण्यासाठी येत असत, परंतु वाढत्या प्रदूषणामुळे यात पूर्णपणे खंड पडल्याचे त्यांनी सांगितले. ३ मार्च रोजी दुपारी एका ऑलिव्ह रिडले जातीची मादी अंडी घालत असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले होते. अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले. या अंड्यांचे योग्य पद्धतीने जतन करण्यासाठी कांदळवन कक्षाने उपाययोजना आखत २४ तास पहारा ठेवला होता.

समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यात यश येत असल्याने ऑलिव्ह रिडले जातीचे कासव येथे पुन्हा घरटी करू लागली आहेत. पूर्वी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झाडी होती, केतकीची जंगले होती, ती नाहीशी झाल्याने या घरट्यांमध्ये खंड पडलेला असवा. परंतु सर्वांच्या प्रयत्नाने हे दिवस परत आलेले आहेत.

- प्रसाद गायकवाड, सरपंच- किहीम ग्रामपंचायत

पिल्ले बाहेर पडताना घरट्यातील वाळू थोडीशी खचत असल्याचे पाहिल्यानंतर पिल्ले बाहेर येण्याची वेळ जवळ आल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर ओहोटीची योग्य वेळ आणि तापमानाचा योग्य अंदाज घेत ही पिल्ले बाहेर आली होती. साधारण १२० पेक्षा जास्त अंडी एका मादीने घातलेली असावीत, त्यामुळे अद्याप साधारण ६० पिल्ले शनिवारी सकाळी बाहेर येऊ शकतात. किहिम ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. अंडी घातल्यानंतर मादी कासव समुद्रात निघून गेले होते.

- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष अलिबाग

logo
marathi.freepressjournal.in